आदिवासी समाजाच्या दुखांची इंग्रज सरकारला प्रथम झालेली जाणीव…..

 

आदिवासी समाजाच्या दुखांची इंग्रज सरकारला प्रथम झालेली जाणीव…..



सह्याद्रीच्याच नव्हे तर भारतातील सर्व पर्वतरांगांचा विचार केला तर या सर्व पर्वत रांगांच्या कुशीत आपणास आदीवासी समाज बांधव वास्तव्य करत असल्याचे दिसून येते. निसर्गाचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर वैभव संपन्न असा हा निसर्ग जपण्याचे काम आदिवासी जमातींनी केले असल्याचे आपणास दिसून येते. निसर्गातील वैविध्य जाणून घेत असताना त्याच्या संवर्धनात मोलाची भूमिका बजावणारे आदिवासी आपण विसरून कसे चालेल. म्हणून सह्याद्रीच्या भ्रमंतीमध्ये मी या समाजाचा अगदी जवळून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्याविषयी माझ्या अनेक मित्रांसोबत चर्चा केली. कधी या चर्चेतून सकारात्मक मुद्दे बाहेर येत…तर काही मुद्द्यांवर आम्ही तासनतास चर्चा करत परंतु विषय काही संपत नसे. माझ्या अनुभवातून समोर आलेले निष्कर्ष मी आपणासमोर मांडत आहे. यातील निष्कर्ष मी फक्त लेखणीतून मांडत नसून ते अगदीच जगण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे…..नव्हे नव्हे मी ते जगत आहे. माझा उगम…माझ्या जीवनाचा प्रवाह या जीवनशैलीतून घडवत असताना अनेक गोष्टी मला अभिमानास्पद वाटतात…तर काही मुद्द्यांवर माझी मान खाली जाते. परंतु असो आज अनेक मार्गाने आदिवासी समाजात जनजागृती मोठ्या प्रमाणात सुरु आहे याचा मला खास करून अभिमान आहे.

‘आदिवासी’ या शब्दाच्या उगमाचा विचार केला, तर त्याचा अर्थ होतो ‘आदिम काळापासुन वास्तव्य करणारे लोकं’. आर्यांचे आपल्या देशात आगमन होण्यापूर्वी ‘आदिवासी’ हे या देशात रहिवासी होते. यातून आदिवासींच्या प्राचीनत्वाची जाणीव आपणास होते. प्राचीन काळी आदिवासी समाज बांधव टोळ्या टोळ्यांनी राहत होते. आर्यांच्या आगमनानंतर काही टोळ्या पराभूत झाल्याने आर्यांशी समरस झाल्या. तर काही टोळ्या आपले अस्तित्व टिकविण्यासाठी जंगलात, द-याखो-यांत आश्रयाला जावून राहिल्या. ज्या टोळ्या आर्यांशी समरस झाल्या त्यांचे राहणीमान बदलून आर्यांशी मिळतेजुळते झाले. परंतु जंगलात वास्तव्यास गेलेल्या लोकांचे राहणीमान, संस्कृती, पेहराव हा अबाधित राहिला.

जंगलात वास्तव्यास असणारे आदिवासी बांधव हे निसर्गपूजक होते. वृक्ष, पक्षी, प्राणी, साप यांना ते देव मानीत व त्यांची पूजा करत. त्यामुळे या प्राण्यांचे, वृक्षांचे एक प्रकारे ते संरक्षण करत होते. जंगलात वास्तव्यास असणा-या या टोळ्यांचे प्रादेशिक विभाग ठरलेले होते. त्यांच्यावर आपापल्या टोळीची बंधने असतं. या सर्व टोळ्यांची विवाह पद्धती, धार्मिक रूढी, दैवदैवते, टोळ्यांची रचना, नाचगाणी यात बदल होता. इंग्रजांची राजवट येईपर्यंत आदिवासी टोळ्यांमध्ये अशा प्रकारची समाजरचना टिकून होती.

योजनांची पानगळती

इंग्रजांची राजवट सुरु झाल्यानंतर आदिवासी समाज व्यवस्थ्येत बदल होण्यास सुरुवात झाली. यातून आदिवासींचे हिंदुकरण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आदिवासींना ‘हिंदुधर्माचा आचार करणा-या वन्यजमाती’, ‘वन्य जमाती’, ‘पहाडी टोळ्या’ तर कधी ‘मागासलेले हिंदू’ असा उल्लेख केला जावू लागला.
कालांतराने आदिवासी समाजाबरोबर शासन व बिगर आदिवासी समाजाचा संपर्क वाढत गेला व यातून संघर्षाची ठिणगी पेटत गेली. यामुळे सामाजिक चळवळी, लढे, बंडाळी यासारखे प्रसंग वारंवार उद्भवू लागले. सन १७८२ व १८१९ यादरम्यान राजमहल टेकड्यांतील वन्य जमातीचा प्रदेश व ओरिसातील कोहान विभागासाठी स्वतंत्र कायदा करावा लागला. महाराष्ट्रात भिल्ल व महादेव कोळी जमातींनी एकोणीसाव्या शतकात अनेक उठाव केले. हिंदुस्तानातील लहान-मोठ्या आदिवासींच्या बंडांमुळे १८७४ मध्ये ‘अनुसूचित जिल्ह्याचा कायदा’ पास करण्यात आला. १९३६ साली मुंबई राज्यात पंचमहाल, पश्चिम खान्देश, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांचे काही क्षेत्र ‘अंशतः वगळलेला प्रदेश’ म्हणून उल्लेख केला. १९३८ मध्ये सर सेमिग्टनने आदिवासी जमातींची पाहणी केली. यातून सरकारला आदिवासी समाजाच्या दुखाची चांगलीच जाणीव झाली. यामुळे आदिवासींच्या विकासाकडे अनेकांचे लक्ष्य गेले. यातून खास विकास निधी व आदिवासी कल्याणाच्या योजना आखण्यास सुरुवात झाली.

आज आपण स्वतंत्र आहोत. लोकशाही शासन व्यवस्थेचा आपण अंगीगार केलेला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार आदिवासी विकासाच्या अनेक तरतुदी केलेल्या आहेत. परंतु ज्या प्रमाणात आदिवासींचा विकास होणे अपेक्षित होते, त्याप्रमाणात विकास झाल्याचे आपणास दिसून येत नाही. आर्थिक , शैक्षणिक, आरोग्य आदी महत्त्वपूर्ण बाबींचा आपण आजही बारकाईने अभ्यास केल्यास आपणास प्रत्येक बाबतीत कुपोषण पाहावयास मिळते. झाडाला जणू पालवी फुटावी आणि सर्व निसर्ग बहरून निघावा अशा अनेक योजना येथे येतात…परंतु आदिवासींच्या जीवनात बहार येण्याच्या आतच विकासकामांना पानगळती सुरु होते……यातून विकासाची फळे ज्यांच्यासाठी होती त्यांच्या नशिबात फक्त मृगजळच दिसते. योजना आहेत, त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी हि दिला जातो. परंतु म्हणतात ना पैशाची मरगळ असली तरी चालते विचारांची मरगळ कधी नसावी. ती अधिक घातक असते. यानुसार जे योजना राबवतात ते आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी आलेला निधी अधिकाधिक प्रमाणात आपल्या खिशात कसा जाईल याचा विचार करतात……ज्याच्यासाठी योजना आहेत तो मात्र असाच उघडा-नागडा आपल्या किंवा इतरांच्या शेतात राबत असतो. विकास योजनांची पुसटशी कल्पनाही त्याला नसावी हेच दुर्दैव प्रकर्षाने जाणवते.

उपाय माहित नसतील तर समस्या मांडण्याचा अधिकार आपणास नसतो या विचाराचा मी आहे…म्हणून मी अधिक समस्या येथे व्यक्त करत नाही. परंतु मुग गिळून गप्प बसणा-यांमधला मी नाही. आदिवासी समाजातील संस्कृती, चालीरीती, शिक्षण, प्रबोधन, आदिवासींचा क्रांतिकारी इतिहास, योजना अशा अनेक क्षेत्रात प्रत्येकाला काम करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे ‘काही तरी करणार म्हणजे करणार’ असा ठाम निर्धार मी करतोय. सर्वात प्रथम आदिवासी युवा शक्ती एका व्यासपिठावर आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे या जाणीवेतून काम करतोय.

©www.rajuthokal.com

0 comments :

Post a Comment

 

Trending Posts




Total Pageviews

Followers

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा




Contact Form

Name

Email *

Message *

Book Publication

LOGO

LOGO

Featured Post

आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन २०२४

Clicked By Babubhai Rongate www.aboriginalvoice.blogspot.com

Labels

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9890151513 .

© Aboriginal Voices. You are not allowed to publish the content without permission.

Aboriginal Voice is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find many cultural photographs on this blog.