प्राणवल्लभा सह्याद्रीतील बितनगड
अकोले तालुक्यातील कळसूबाई गिरीदुर्ग डोंगररांग आपणा सर्वाना परिचित आहे. या डोंगर रांगेत सुमारे 4000 फुट उंची असणारा हा बितनगड मध्यम श्रेणीचा आहे.
बितनगड किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग, औंढा, पट्टा, आड, म्हसोबाचा डोंगर आणि कळसूबाईचा दिसतो.
बिताका या छोटीसी आदिवासी वस्ती असलेल्या परंतु निसर्गाचे रेखीव सौंदर्य असलेल्या गावाजवळ असणारा हा किल्ला तसा स्थानिकांच्या दृष्टीने वंचितच आहे. आजूबाजूच्या परिसरात या किल्ल्याविषयी आपण चौकशी केल्यास या किल्ल्याविषयी कुणाला काही माहित असल्याचे आपणास जाणवत नाही. परंतु आज सोशल नेटवर्कमुळे या किल्ल्याच्या भौगोलिक व ऐतिहासिक बाजू जगासमोर येत आहेत. या किल्ल्याचे प्राचीनत्व जपण्यासाठी या किल्ल्यावर लोकसहभागातून कार्य होणे गरजेचे आहे. वनविभाग किंवा तालुका प्रशासन अजून या किल्ल्याच्या विकासाविषयी अधिक जागृत असेल असे वाटत नाही. बिताका या अकोले तालुक्यातील गावात सुदैवाने आज वीज, शिक्षण आदी सुविधा पोहचलेल्या आहेत. काही खाजगी वाहतुकीच्या साधनांमुळे आज इथे लोकांना काही प्रमाणात जगणे सुसह्य झाले आहे. परंतु तरीही पावसाळा ऋतूमध्ये मात्र धो-धो कोसळणारा पाऊस आणि सोसाट्याचा वारा…त्यातच भर घालणारी थंडी यांचा सामना येथील लोकांना करावा लागतो. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होते. धुक्यामध्ये वाट काढत लोकांना आपली शेतीची कामे करताना एक कसरत करावी लागते. येथील लोकांचे राहणीमान साधेच असून भात, वाल, काही प्रमाणात गहू आदी पिके घेतली जातात. जमीन हि डोंगर उताराची असल्याने उत्पन्नाच्या दृष्टीने लोकांना अधिक कष्ट घ्यावे लागतात. पिण्याच्या पाण्यासाठी गावात विहिरी आहेत. उन्हाळा पावसाळा या विहिरींतील पाणी डोक्यावर वाहून न्यावे लागते.
पहाण्याची ठिकाणे :
गडावर जाण्यासाठी एकूण १४० कातळात कोरलेल्या पाय-या आपणास सर कराव्या लागतात.
किल्ल्याचा माथा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्यावर दोन गुहा आणि ९ पिण्याच्या पाण्याची टाक्या आहेत. परंतु एक गुहा सध्या सुस्थितीत असून त्यात ४-५ जणांची राहण्याची व्यवस्था होवू शकते. एक गुहा सुरुंग लावून तोडली असल्याच्या स्पष्ट खुणा आहेत. तसेच यात चिखल साठल्याने मुक्कामास योग्य नाही. गडावरील टाकी सुरुंग लावून उध्वस्त केल्याने गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. गडाच्या पाय-या सुरु होतात तिथे जवळच उजव्या बाजूला कातळात एक भुयार आहे. या भुयारात आपणास सरपटत जावे लागते. आत काय आहे हे पाहण्यासाठी सोबत विजेरी असणे अत्यावश्यक आहे. काही उध्वस्त वास्तु आहेत. किल्ल्यावरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर, डोंगररांगा मनाला भुरळ घालतात.
पोहोचण्याच्या वाटा :
घोटी – भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. या गावातून एकदरा फाटा अंदाजे १२ किमी अंतरावर आहे. एकदरा फाट्यापासून बितनगडाच्या पायथ्याचे बितनवाडी गाव ६ किमीवर आहे.
गडाच्या पायथ्याशी बिताका हे गाव आहे. या गावातून किल्ल्याकडे जाता येत. शेतातून वाट काढत आपण किल्ला चढायला सुरुवात करतो. किल्ला चढायला कठीण नाही, पण खडकात खोदलेल्या पायर्या चढताना नीट चढून जाण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दोरी (रोप) असू द्यावी. पावसाळ्यात शेवाळ्यामुळे पायर्या निसरड्या होऊ शकतात. नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. बितंगवाडीत राहता येतं. टाकेद (बिताका गावापासून पासून सुमारे १५ किलोमीटर) या गावातील जटायूच्या देवळात राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
बितंगवाडीतून १ तास लागतो.
दुचाकी वाहन असेल तर आपण गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी घेवून जावू शकतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.
0 comments :
Post a Comment